Tuesday, May 25, 2010

तक्रार .. कशाला?


गेल्या आठवड्यात पारा रोज रोज half century ठोकत होता. सगळेच अतिशय त्रस्त होते ..
मनात कानपूरला असंख्य नावं ठेवून झाली आणि काही विचार मनात डोकावून गेले..

असं कसं सगळंच विचित्र ?
उन्हाळ्यात कूलर, हिवाळ्यात हिटर,
एरवी सदैव पंख्याची घरघर

पाऊस कधी पडतच नाही,
पडला कधी तर थांबायचं नाव नाही
पण गारवा आणणारा पाऊस कधी येणारच नाही

समुद्र नाही तरी टपटप घाम,
डोंगरावर नाही पण हुडहुडी जाम,
वार्‍याची झुळूक मात्र कधी सुद्धा नाही

त्या झोपडीतले लोकही राहतातच की असेच,
जरी लोडशेडिंग दिवसभर अन्‌ पाणी येत नसे,
सवयच लागलीय आपल्याला तक्रार करायची,
जरी कुणीही ऐकून घेत नसे ...

तक्रार नाही केली तर वाटेल का सगळं छान ?
नुसता विचार तरी करु एक महान ..

Sunday, May 9, 2010

पावसाच्या सरी....

रणरणतं ऊन संपेल का कधी?
विचार करतानाच आल्या पावसाच्या सरी

कर्कश कडकडाट झाला जरी,
मोहवून टाकती पावसाच्या सरी

सोसाट वारा अन गडगडाट भारी,
खट्याळ खेळकर अशा पावसाच्या सरी

चिखल, राडेराड पसरे परी,
मातीला सुगंध आणती या पावसाच्या सरी

ओले चिंब कपडे, चहा-कांदाभजी
कोणाला आवडणार नाहीत पावसाच्या सरी?

चकचकीत रस्ते आणि लखलखीत पाने,
मन करती स्वच्छ अशा पावसाच्या सरी

सगळ्या चिंता अन काळज्या भारी,
क्षणात भुलवती अशा पावसाच्या सरी